शुक्रवार, १ मे, २०१५

यत्र नार्यस्तु न पूज्यन्ते...

या देशाच्या परंपरेत महिलांना नेहमीच मानाचं स्थान राहिलंय... आपल्या देवघरांमध्ये श्रीकृष्ण, रामचंद्राबरोबर राधाही असते आणि सीताही.. लक्ष्मी, सरस्वती या आपल्याला कायमच वंदनीय असतात... पण स्त्रियांना आपण रोजच्या वागण्यात मानाचं स्थान देतो का? किमान हिंदू संस्कृती आणि परंपरांचे गोडवे गाणाऱ्यांनी तरी ते द्यायला हवं. पण तेच याला हरताळ फासताना दिसतायत...
माझी मैत्रिण रश्मी पुराणिक हिच्यासोबत घडलेला हा ताजा किस्सा त्याचं जातीवंत उदाहरण... नेमकं काय घडलं ते तिच्याच शब्दांत तिच्या फेसबूक वॉलवरून साभार...



स्वामी नारायण मंदिरात योगी सभागृहात आज गोवंश हत्या बंदी कायदा केला म्हणून सत्कार सोहळा होता. मुख्यमंत्रयनच सत्कार Santa cruz जैन संघ करणार होता! त्या सभागृहात गेल्यावर आयोजकांनी सांगीतल ही जागा पत्रकारांसाठी आहे..तिथे बसायला गेले तेव्हा एक आयोजक येऊन म्हणाला " तीन रांगा सोडून बसा,पहिल्या तीन रांगेत पुरूष बसतील,आमच्यात महिला पुढे बसत नाहीत" मी त्यांना म्हंटल हे चुकिच आहे, पत्रकारांसाठी राखीव जागा आहे,तिथे मी कुठेही बसेन,महिला म्हणून मला मागे बस हे तुम्ही सांगू शकत नाही...आयोजक म्हणाला "आमच्या घरातील आया,बहिणी मागे बसल्या आहेत,हा इथले नियम आहे" मी म्हंटल हे अजुन चुकीच आहे, तुम्ही तुमच्या घरातील महिलांचा आणि माझाहि अपमान करत आहात... हे झाल्यावर मी आशिष शेलार यांना सांगितल,त्यांनी आयोजकांना सांगीतल असं करू नका, मला पहिल्या रांगेत बसू द्याव.. शेलार बोलले म्हणून त्यांनी थोड्यावेल बसू दिल...पण पुन्हा दोन आयोजक आले आणि मला दुसरीकडे बसा, इथे बसू शकत नाही..हे सांगायला लागले...आणि मी वैतागून निघून गेले.... गोवंश हत्या बंदी कायदा आणला म्हणून सत्कार करणारे, गाय या प्राणयाला मान देणारे ,मला साधं माणूस म्हणूनही नीट वागवू शकले नाहीत... महिला आहे म्हणून मला दूर बसायला सांगितल.... ही कसली तुमची संस्कृती?? कोणता देव स्त्रीला तिचा मान नाकारतो??? आणि Field वर काम करणारा पत्रकार हा पत्रकार असतो...त्यात स्त्री-पुरुष कुठून आले??? हे सगळं सहन करण्यापलीकडे आहे!

 सर्वप्रथम माझी पूर्वीची सहकारी, समव्यावसायिक आणि चांगली मैत्रिण या नात्यानं एक पत्रकार म्हणून या घटनेचा निषेध... पण केवळ निषेध करून समाधान होईल, असं वाटत नाही. त्यामुळेच यावर थोडं अधिक सविस्तर लिहिलंय... याला जोडून आणखी एक घटना म्हणजे मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर यांनाही मागच्या रांगेत बसवण्यात आलं... ही आणखी एक धक्कादायक बाब...बातमीसाठी लिंक
मुळात रश्मी तिथं गेली होती ती पत्रकार म्हणून... तिला तिच्या चॅनलनं हा कार्यक्रम कव्हर करायला सांगितला. ती तिथं फडणवीसांची फॅन आहे म्हणून किंवा जैन समाजाची आहे म्हणून गेली नव्हती... तिचा तिथं जाण्याचा उद्देश हा संपूर्णतः व्यावसायिक होता. तिच गत अलका केरकर यांची... त्या मुंबईच्या द्वितीय नागरिक या नात्यानं कार्यक्रमाला उपस्थित होत्या... शहरात एखादा कार्यक्रम असेल आणि त्याला महापौर-उपमहापौरांना निमंत्रण असेल, तर त्यांचा मान हा सर्वात पहिला असतो, हा साधा राजशिष्टाचारदेखील यावेळी पायदळी तुडवला गेला...
यावर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळे खुलासे आलेत... काही ठिकाणी स्वामीनारायण मंदिर आणि जैन समाजानं असं काही घडलंच नसल्याचा अजब दावा केलाय... पण त्याच वेळी महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, हेदेखील मान्य केल्याचं दिसतंय. हे अजब आहे. म्हणजे आम्ही शेण तर खातो पण त्याला शेण खाल्लं म्हणायचं नाही, श्रावणी केली म्हणायचं, अशातला हा प्रकार आहे... काही ठिकाणी आलेल्या बातम्यांनुसार आयोजकांनी घडल्या प्रकाराचं थेट समर्थनच केलंय... कारण काय, तर म्हणे आम्ही स्त्रियांना साधूसंतांच्या जवळ बसू देत नाही. एक निश्चित अंतर सोडून त्यांना बसवलं जातं... साधूसंतांच्या जवळ स्त्रिया आल्या तर काय होतं, याचा खुलासाही या आयोजकांनी केला असता, तर बरं झालं असतं... म्हणजे या देशातल्या तमाम साधूसंतांनी हाच मार्ग पत्करला असता आणि आसाराम बापू आणि नारायण साईसारख्या 'साधूं'ना 'संधी'च मिळाली नसती...
देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्या सत्ता आल्यापासून हिंदू तथाकथित संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांना गगन ठेंगणे वाटू लागलंय... मग तो स्त्रियांना मागच्या रांगेत बसवणारा हा जैन संघ असो की भाजपचे 'संत' खासदार साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची, साध्वी देवा ठाकूर यांची विधानं... मुळात मोदींना देशानं निवडून दिलंय ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर... म्हणजे निवडून यायचं विकासाचे गोडवे गाऊन आणि अजेंडा राबवायचा अतिरेकी हिंदुत्वाचा !
आता प्रश्न उरतो, तो स्त्रियांना अशी दुय्यम वागणूक देणाऱ्यांवर काय कारवाई होणार याचा... मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमातच आयोजकांचे कान उपटले, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी या घटनेचा निषेध करत तो सत्कार नाकारला असता, तर त्यांची प्रतिमा अधिक मोठी झाली असती... स्त्रियांचा असा अपमान करणाऱ्यांच्या हस्ते सत्कार स्विकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी त्यावेळी घ्यायला हवी होती... पण भाजपच्या पाठीशी 'सार्थ' उभ्या असलेल्या जैन समाजाला दुखवायची त्यांची हिंमत झाली नसावी... असो. हा त्यांच्या राजकारणाचा भाग झाला. त्यांनी चार खडे बोल सुनावले, हे ही नसे थोडके.
रश्मीनं आयोजकांविरोधात काही तक्रार केलीये की नाही, हे माहित नाही. पण ती केली असेल, तरी त्यावर काही कारवाई होईल, अशी आशा नाही... अलका केरकर तर बोलून-चालून भाजपच्या नेत्या... त्यामुळे त्यांनी अशी काही तक्रार करण्याचा प्रश्नच नाही. त्यांना आपला अपमान झालाय, असं वाटलं तरी खूप झालं...
स्वतःला पुरोगामी आणि प्रगतीशील म्हणवून घेणाऱ्या राज्यात, जगाचे किंवा गेलाबाजार आशिया खंडाचं नेतृत्व करण्याची मनिषा बाळगणाऱ्या देशात असले प्रकार घडणं लांच्छनास्पदच म्हणावं लागेल...

जाता जाता...
देशाचे गृहराज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनीही अकलेचे तारे तोडलेत... म्हणे पत्नीवर पतीनं बलात्कार केला, तर तो फौजदारी गुन्हा होऊ शकत नाही... या विधानाला चौधरी पुन्हा संस्कृतीचाच संदर्भ देतायत... धन्य आहे ! म्हणजे आता मोदी सरकारच्या मते पत्नीवर तिच्या इच्छे विरुद्ध संभोग कऱण्याचा पतीला पूर्ण अधिकार आहे तर... भारतीय परंपरेनुसार लग्नानंतर पत्नी ही पतीच्या मालकीची वस्तू होते, हेदेखली एकदा सरकारनं जाहीर करून टाकावं... म्हणजे मग बलात्कारच नव्हे, तर तिला मारहाण, तिचा चारचौघात अपमान किंवा अगदी तिचा खून करायला तरी पती-परमेश्वर मोकळा !

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

भूकंप, नेपाळ आणि आपण...

नव्या ब्लॉगची पहिली पोस्ट, अर्थातच नुकत्याच झालेल्या भूकंपाबद्दल...

भूकंप, पूर या बातम्या अधेमधे येतच असतात. १४-१५ वर्षं मीडियात काम केल्यानंतर अशा बातम्यांचं फारसं काही वाटत नाही... माणसं मरतात, त्याची अर्थातच हळहळ वाटते. पण प्रॉफेशनली विचार करता या बातम्या अधून मधून कराव्याच लागतात. मग नेपाळच्या भूकंपामध्ये लिहिण्यासारखं वेगळं काय असणार?
यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला वाटला तो ज्या तडफेनं भारतानं नेपाळला मदत पाठवली तो... भूकंपाचे हादरे भारतालाही बसले होते, पण यामुळे नेपाळमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय हे कळताच केंद्र सरकारनं तातडीनं नेपाळी पंतप्रधान-अध्यक्षांशी संपर्क
साधला आणि मदत रवाना केली... माझ्या मते अन्य कुठल्याही देशापेक्षा (चीनसकट) भारतानं कितीतरी आधी ही मदत रवाना केली होती... यात पंतप्रधान मोदी यांचं कौतूक अनेकांनी सुरू केलंय. पण खरंतर तिथं कुणीही असतं, तरी मला वाटतं हेच केलं असतं. कारण नेपाळला केलेली मदत ही मानवतेच्या दृष्टीनं जितकी मोलाची आहे, तितकीच ती आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनंही महत्त्वाची आहे...

आठच दिवसांपूर्वी एक बातमी आली होती... चीन नेपाळच्या सीमेपर्यंत रेल्वे मार्ग टाकणार आहे म्हणे... यासाठी थेट माऊंट एव्हरेस्टमधून बोगदा खणला जाणार आहे... हा प्रस्ताव म्हणे नेपाळनंच दिला होता. म्हणजे चीनी ड्रॅगनची शेपटी थेट हिमालयामध्ये वळवळणार आणि तीदेखील नेपाळच्या विनंतीवरून... चीनचा एकूण इतिहास बघता या मार्गाचा वापर भारतावर लष्करी दबाव टाकण्यासाठी होणारच नाही, असं नाही...

मध्येच विषयांतर करायचं कारण या दोन्ही गोष्टी एकाच नजरेतून बघायला हव्यात... एकीकडे नेपाळ चीनशी चुंबाचुंबी करत असताना भारतानं नेपाळला तडफेनं मदत करणं आवश्यकच होतं. तशी ती केली गेली हे विशेष....
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दरवेळीप्रमाणे आताही नेपाळला धावून गेलेत... त्यामागे कोणताही स्वार्थ नसतो, हे संघाचे विरोधकही मान्य करतील... पण याच संघाच्या मुशीतून घडलेले नरेंद्र मोदी यांनी निःस्वार्थी भावनेतून ही मदत करण्याची काहीच गरज नाही... या विधानामुळे अनेकांना मानवतेचा कढ येऊन त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, याची मला कल्पना आहे.. पण राजकारणात सर्व क्षम्य असतं म्हणतात... त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वार्थ ठेवून केलेली मदतही क्षम्यच म्हणावी लागेल... नेपाळला चीनपासून जास्तीत जास्त लांब नेण्यासाठी याचा उपयोग सरकारनं केला पाहिजे. नाहीतर "भवरे ने खिलाया फूल... Fool को ले गया राजकुँवर..." असं व्हायचा धोका अधिक...